घरकुल न बांधताच उचलले बिल?; निधी वितरणावर गंभीर प्रश्नचिन्ह.......
प्रतिनिधी जीवन जाधव.
गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ करत असल्याच समोर आला आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण झालेले नसताना किंवा काही ठिकाणी बांधकाम सुरूही झालेले नसताना शासकीय निधीचे बिल उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी, कामाची प्रगती आणि शासनाच्या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच पुढील निधी देणे अपेक्षित असते. असे असताना घरकुलाचे बांधकाम न करता अथवा अपूर्ण असतानाच निधी वितरित झाला असेल, तर हा प्रकार गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
घरकुल बांधकाम पाहणी न करताच निधी मंजूर?
आहे त्या घरावर घरकुल दाखवून अनेक गावात बिले उचलण्याचा प्रकार झाला असून ज्यांना पक्के घरी आहेत त्यांनाच घरकुल मंजूर करून लाभ दिल्याचा ग्रामीण भागात सर्रास बोललं जात आहे. ज्यांना घरकुलची गरज आहे त्यांना लाभापासून वंचित ठेवायचं व जे आधीच पक्क्या घरात आहेत त्यांना लाभ देण्याचाही प्रकार घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
अनेक घरकुलाचे काम प्रत्यक्षात झाले आहे की नाही, बांधकाम कोणत्या टप्प्यावर आहे, लाभार्थ्याने शासनाच्या अटींची पूर्तता केली आहे का, याची संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली का, असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले आहेत.
फोटो, जिओटॅगिंग, बांधकामाची प्रत्यक्ष स्थिती आणि निधी वितरणाची नोंद यांची तपासणी केल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने कागदोपत्री नोंदींबरोबरच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
लाभार्थी मात्र घराच्या प्रतीक्षेत
शासनाचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात घर उभे राहिले नसेल, तर गरजू लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक कुटुंबे आजही कच्च्या घरात किंवा मोडकळीस आलेल्या घरात राहण्यास मजबूर असताना, घरकुलाच्या नावावर निधी वितरित होऊनही बांधकाम झाले नसेल तर हा प्रकार निश्चितच चिंताजनक आहे.
निधीचा हिशोब जनतेसमोर आणण्याची मागणी
घरकुल योजनेतील लाभार्थी यादी, मंजूर रक्कम, आतापर्यंत वितरित झालेला निधी, बांधकामाची सद्यस्थिती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या पाहणीच्या नोंदी सार्वजनिक करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
तसेच, ज्या घरकुलांचे बांधकाम कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आले आहे, त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खरोखर बांधकाम झाले आहे की केवळ कागदोपत्री पूर्तता दाखविण्यात आली आहे, याची तपासणी करावी.
चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी
घरकुल न बांधताच बिल उचलण्यात आल्याचे आरोप खरे ठरल्यास, शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या संबंधित व्यक्ती अथवा अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच चुकीच्या पद्धतीने वितरित झालेल्या निधीची वसुली करून तो शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी कोण आहे, निधी कोणाच्या माध्यमातून वितरित झाला आणि प्रत्यक्ष पाहणी न करता बिल कसे मंजूर झाले, याचा तपशील जनतेसमोर येणे आवश्यक आहे.