शिराळा उपसा सिंचन योजनेला आमदार सावंतांचा ‘आधार’; १२ लाखांचे वीज बिल भरले!
ऐन खरीप हंगामात बळीराजाला मोठा दिलासा; परांडा तालुक्यातील जवळपास २० गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
परांडा : ऐन खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी शिराळा उपसा सिंचन योजनेचे थकीत असलेले तब्बल १२ लाख रुपयांचे वीज बिल भरण्यासाठी धनादेश दिला आहे. त्यामुळे योजनेचा वीजपुरवठा सुरळीत होऊन सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सावंत यांच्या या तत्पर मदतीमुळे परांडा तालुक्यातील जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिराळा उपसा सिंचन योजनेचे वीज बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनावर होण्याची शक्यता होती. शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले हे संकट लक्षात घेऊन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी पुढाकार घेत १२ लाख रुपयांचा धनादेश देत थकीत वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावला.
या निर्णयामुळे शिराळा उपसा सिंचन योजनेचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून, योजनेच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली असून, खरीप हंगामात बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात तातडीने धावून जाणे आणि प्रत्यक्ष मदतीचा हात देणे, ही आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांची कार्यपद्धती असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.