मल्हार पाटील यांच्या जिल्हा दौऱ्याची जोरदार चर्चा; जनसंपर्काच्या झंझावाताने विरोधकांमध्ये वाढली धाकधूक
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात युवा नेतृत्व म्हणून वेगाने उदयास येत असलेले मल्हार पाटील यांचा जिल्हाभर सुरू असलेला दौरा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका पिंजून काढत नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि विकासकामांबाबत थेट संवाद साधणे, यामुळे त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोहारा दौऱ्यादरम्यान महायुतीतील सहकारी आनंद पाटील यांनी मल्हार पाटील यांचे सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी राहुल पाटील सास्तूरकर, राजेंद्र पाटील, आप्पासाहेब पाटील, युवराज जाधव, धनंजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मल्हार पाटील म्हणाले, "जनतेचे प्रेम, विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद असून, लोहारा परिसरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हेच माझे ध्येय आहे."
जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या त्यांच्या दौऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात असून, स्थानिक प्रश्न तातडीने जाणून घेण्यावर भर दिला जात आहे. या व्यापक जनसंपर्कामुळे मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.