धाराशिवमध्ये भेसळीचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासन कारवाई कधी करणार?
धाराशिव शहरासह परिसरात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून केला जात आहे. "प्रशासन सुस्तीत आणि भेसळ करणारे मस्तीत" अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये खाद्यतेल, मसाले, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, नियमित तपासणी व नमुने संकलनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सण-उत्सवांच्या काळात भेसळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित विभागाने विशेष पथके स्थापन करून अचानक छापेमारी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने संशयित आस्थापनांवर कठोर कारवाई करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच तपासणीची माहिती सार्वजनिक करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन भेसळ करणाऱ्यांवर वचक निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आता धाराशिवकरांचा एकच सवाल आहे—अवैध भेसळीवर अन्न व औषध प्रशासनाची ठोस कारवाई नेमकी कधी होणार?